Mahatma फुले यांचे Karya महात्मा फुले यांचे कार्य

महात्मा फुले यांचे कार्य



Pradeep Chawla on 12-05-2019

जोतीराव गोविंदराव फुले (एप्रिल ११ , इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०), महात्मा फुले नावाने प्रसिद्ध, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८९० या साली मिळाली. शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहला.



अनुक्रमणिका



१ बालपण आणि शिक्षण

२ शैक्षणिक कार्य

३ सामाजिक कार्य

४ सत्यशोधक समाज

५ लेखन साहित्य

६ पश्चात प्रभाव (लीगसी)

७ तृतीय रत्‍न

७.१ नाटकाचे स्वरूप

८ महात्मा फुले यांच्यावर लिहिलेली पुस्तके

९ फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम

१० समारोप

११ संदर्भ आणि नोंदी

१२ बाह्य दुवे



बालपण आणि शिक्षण



जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.



जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

शैक्षणिक कार्य



महात्मा फुल्यांच्या कवितेतल्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

“ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।



नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।





बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली. जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले (?) भारतीय होत.

सामाजिक कार्य



मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.



‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌ऱ्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजीक प्रबोधन केले. मुलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने पुधीलप्रमाणे आहेत .



स्त्री अथवा पुरुष एकंदर सर्व गावाचे , प्रांताचे , देशाचे , खंडाचे संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वताच्या संबंधात , स्त्री आणि पुरुष या उभयतांनी आठवा सर्व स्त्रियांनी अथवा एकमेकात एकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे .

आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मता स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात सार्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे .

आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे . जो आपल्यापासून दुसर्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही , अथवा जो कोणी आपल्यावरून दुसर्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला सत्य्वर्तन करणारा म्हणावे .

आपल्या सर्वांच्या निर्मिकाचे एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे . त्यातून एखादा मानव आथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही , त्याप्रमाणे जबरी न करणारास सत्यवर्तन करणारे म्हणावे .



स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह , आपल्या भाऊबंदास , आपल्या सोयर्याधायर्यास आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोर्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत , त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात , परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणार्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे .

महात्मा फुले यांनी मानवास सत्यधार्माचा जो बोध केला त्यातील हि काही वचने आपण वाचली कि लक्ष्यात येते , ज्योतीरावाचा आवाका किती मोठ्ठा होता . त्यांना अखिल विश्वाला कवेत घेणार्या माणसाला माणूस म्हनून प्रतिष्टा देणारा धर्म साकार करायचा होता . त्यासाटी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात आमूलाग्र बदल घडऊन आणायचा होता .त्यासाटी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे . अखंड या काव्यप्रकारात त्यांनी मानवाचा धर्म , आत्मपरीक्षण , नीती , समाधान , सहिष्णूता , सदसदविवेक , उद्योग , स्वच्छता , गृहकार्यदक्षता , इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे . ज्योतीरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले , मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला , त्यातील काही निवडक भाग येथे विचारात घेतला पाहिजे . ज्योतीराव आपल्या अखंडात म्हणतात ,



सर्वांचा निर्मिक आहे एक धनी || त्याचे भय मनी || धरा सर्व ||१||



न्यायाने वस्तूंचा उपयोग घ्यावा || आनंद करावा || भांडू नये ||२||



धर्म राज्य भेद मानवा नसावे || सत्याने वर्तावे || ईशासाटी ||३||



सर्व सुखी व्हावे भिक्षा जी मागतो || आर्यास सांगतो || जोती म्हणे ||४||



दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोतापुर्ते ||१||



विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे || भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२||



स्त्री - पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या || विद्या शिकवाव्या ||



भेद नाही || ३ || स्वतः हितासाठी खर्च जे करती ||



अधोगती जाती || जोती म्हणे || ४ ||



निर्मल निर्धोशी निव्वळ विचारी || सदा सात्याचारी || प्रपंचात ||१||



सूर्यापरी सत्यप्रकाश पेरिता || शांती सर्वा देतो || चंद्र जैसा |||२||



होईना भूदेव जती मारवाडी || मानवा न पीडी || सर्ववत ||३||



अशा सज्जनास मानव म्हणावे || त्यांचे गुण घावे || जोती म्हणे ||४||



क्रोधाचा विटाळ सत्यधर्म पाळी | तो खरा बळी || मानवात ||१||



सर्वांभूती द्या हृदयी कोमल || घालितो अगळ || इंद्रियांस ||२||



जगात वर्ततो सद्गुणी मवाळ || वासनेस मूळ || डाग नाही ||३||



सत्यशोध होता , धिक्कारी तो कवी || तोच सत्यवादी ||



जोती म्हणे ||४||



निर्मिले बांधव स्त्री पुरुष प्राणी || त्यात गोरे कोणी || रंगवर्ण ||१||



त्यांचे हितासाठी बुद्धिमान केले || स्वातंत्र्य ठेविले || ज्या त्या कामी ||२||



कोणास न पीडी कमावले खाई || सर्वा सुख देई || आनंदात ||३||



खरी हीच नीती मानवाचा धर्म || बाकीचे अधर्म || जोती म्हणे ||४||



सत्याविन नाही धर्म तो रोकडा || जनांशी वाकडा || मतभेद ||१||



सत्य सोडू जाता वादामध्ये पडे | बुद्धीस वाकडे || जन्मभर ||२||



सत्य तोच धर्म करावा कायम || मानवा आराम || सर्व ठायी ||३||



मानवांचा धर्म सत्य हीच नीती || बाकीची कुनीती || जोती म्हणे ||४||



सत्याचा जिव्हाळा मनाची स्वच्छता || चित्तास स्वस्थता ||



जेथे आहे ||१|| जेथे जागा धीर सदा हृदयात ||



सत्य वर्तनात | खर्ची द्यावा ||२||



पिडा दु:खे सोशी संकटे निवारी || गांजल्यास तारी || जगामागी ||३||



धीर धरूनिया सर्वा सुख देती || यशवंत होती || जोती म्हणे ||४||

सत्यशोधक समाज



२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.[१]तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

लेखन साहित्य



सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला गुलामगिरी ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.



रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.



जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-

लेखनकाळ साहित्य प्रकार नाव

इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न

जून, इ.स. १८६९ पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा

जून इ.स. १८६९ पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी

इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब

इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी

सप्टेंबर २४ , इ.स. १८७६ अहवाल सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत

मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट

एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ

२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक

१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन

१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकऱ्याचा असूड

४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत

११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र

१३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १

ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २

१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा

२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर

२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र

जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक सामाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी

इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना

१० जुलै इ.स. १८८७ मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र

इ.स. १८९१ (प्रकाशन) पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

Wikisource-logo.svg

यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:

जोतीराव गोविंदराव फुले

पश्चात प्रभाव (लीगसी)



महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.



पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.



‘जोतिबा महात्मा फुले’ नावाचा आणखी एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढत आहेत. त्यात संदीप कुलकर्णी महात्मा फुले असतील आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारतील.



जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.



महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या नावचे पुरस्कारही अगणित आहेत.

तृतीय रत्‍न



तृतीय रत्‍न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतिबांनी २८ व्या वर्षी इ.स.१८५५ साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली.



या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘पुरोगामी सत्यशोधक’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.



आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.

नाटकाचे स्वरूप



या नाटकाला रूढ कथानक नाही. त्यात एक शोषकाचा, एक शोषिताचा असे दोन पक्ष आहेत. अशिक्षित कुणबी, त्याची बायको, भिक्षुक जोशी, त्याचा भाऊ, त्याची पत्‍नी, एक ख्रिस्ती धर्मोपदेशक, एक मुसलमान आणि विदूषक अशी एकूण आठ पात्रे आहेत. या सर्वच पात्रांना स्वत:चे असे चेहरे नाहीत. नाटकाची संकल्पना प्रातिनिधिक पातळीवर आहे. समाजातील एक विशिष्ट वर्ग जन्माने उच्च असल्याच्या एकमेव भांडवलावर समाजातील दुसर्‍या एका अंधश्रद्ध, अडाणी, गरीब वर्गाला कसा लुबाडत असतो, नागवित असतो याचेच प्रातिनिधिक चित्रण या नाटकात आहे.



नाटक म्हणून तृतीय रत्‍नचे लेखन सलग झालेले असून ती अनेक प्रवेशांची मालिका आहे. त्यात लेखकाने पात्रे, स्थळ, काळ, प्रसंग आणि संवाद यात मुक्त संचार पद्धतीचाच वापर केला आहे. त्या दृष्टीने या नाटकाला मुक्तनाट्य किंवा वगनाट्य (वग म्हणजे ओघ. कथानकामधे खंड पाडू न देता ओघाओघाने सांगणे.) म्हणता येईल. दोन फेर्‍या मारल्या की, राजवाडा, आणखी दोन चकरा मारल्या की, घनदाट जंगल ही जशी लोकनाट्यात भरपूर सोय असते तशीच रचना तृतीय रत्‍नची आहे. ठरावीक नाट्यगृह, रंगमंच, प्रकाशयोजना यांचीही गरज नाही. लोक जमताच कोठेही नाटक सादर केले जावे अशीच याची अत्यंत लवचीक रचना आहे. ‘पथनाट्य’ म्हणूनसुद्धा या नाटकाला विशेष महत्त्व आहे.



या नाटकातील ‘विदूषक’ हे पात्र अतिशय महत्त्वाचे आहे. विदूषक या संस्कृत कलोत्पन्न पात्रासह संस्कृत कुलोत्पन्न अशाच त्रितीय रत्‍न (किंवा त्रितीय नेत्र) या शीर्षकाखाली जोतिबांनी मराठी नाट्यरचना सुरू केलेली आहे. पण त्यांनी परंपरागत रचना नाकारलेली आहे. या विदूषकाचे सांकेतिक रूप, त्याचा खादाडपणा, आचरट बोलणे याला पूर्णपणे फाटा दिलेला आहे आणि अत्यंत वेगळाच विदूषक रंगभूमीवर साकारण्याचा प्रयत्‍न जोतिबांनी केलेला आहे आणि तो यशस्वीही झालेला आहे.



हा ‘विदूषक’ एकाच नाटकात अनेक भूमिका वठविणारा आहे. काही प्रसंगी तो निवेदक आहे. काही प्रसंगी तो भाष्यकार आहे. काही ठिकाणी तर त्याची भाषा जहाल आणि तिखट झालेली जाणवते. उपहास, नेमके वर्मावर बोट ठेवणे, बिंग फोडणे आणि रहस्य उलगडून दाखविणे आणि ज्ञानाचा मार्ग धरा हा उपदेश करणे ही कामेही तो अत्यंत चोखपणे करीत असतो. एकाच वेळी नाटकातील पात्रांच्या कृतीमधून प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे अजब कसब व्यक्त होते.

महात्मा फुले यांच्यावर लिहिलेली पुस्तके

Mahatma Phule.jpg



असूड (मराठी नाटक) लेखक : डॉ. सोमनाथ मुटकुळे

क्रांतिबा फुले (नाटक) अनुवादक : फ.मुं. शिंदे. (मूळ आचार्य रतनलाल सोनग्रा साहित्य अकादमीचे प्रकाशन)

महात्मा फुले (चरित्र) लेखक : शंकर कर्‍हाडे

महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखिका : गिरिजा कीर

महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : धनंजय कीर

महात्मा जोतिबा फुले (चरित्र) लेखक : गोविंद तळवलकर

महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : वसंत शांताराम देसाई

महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : निर्मळ गुरुजी

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखिका : अनुराधा गद्रे

पहिली भारतीय शिक्षिका- सावित्रीबाई फुले (चरित्र) लेखक : बा.ग. पवार

महात्मा ज्योतीराव फुले (चरित्र) लेखक : पंढरीनाथ सिताराम पाटील

महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे

महात्मा ज्योतिबा फुले (चरित्र) लेखक : ग.द. माळी

महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : रमेश मुधोळकर

महात्मा जोतीराव फुले (चरित्र) लेखक : नागेश सुरवसे

महात्मा जोतीबा फुले (चरित्र) लेखक : सुखदेव होळीकर

महात्मा जोतीबा फुले (संपादित) प्रकाशक : सूर्या अध्यापन साहित्य

महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य. लेखक : तानाजी ठोेंबरे

महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांचे कार्य. लेखक : विट्ठलराव भागवत

महात्मा फुले जीवन आणि कार्य (संपादित). प्रकाशक : भारतीय विचार साधना प्रकाशन पुणे

महात्मा जोतीराव फुले - जीवन आणि कार्य. लेखक : दिलीप मढीकर

महात्मा ज्योतिबा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो

महात्मा जोतीराव फुले यांचे शेतीविषयक विचार. संपादन : नूतन विभूते मनोविकास प्रकाशन

महात्मा फुले यांचे निवडक विचार (संपादित) प्रकाशक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

महात्मा फुले व्यक्तित्व आणि विचार. लेखक : गं. बा. सरदार

महात्मा फुले राजर्षी शाहू आणि वैचारिक प्रवास. लेखक : हरिभाऊ पगारे

महात्मा जोतीबा फुले यांचे १०१ मौलिक विचार. संपादन : नागनाथ कोतापल्ले

महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ (संपादित) प्रकाशक : सुगावा प्रकाशन

महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ. लेखक : मा.प. bagde

महात्मा फुले व सांस्कृतिक संघर्ष. लेखक : भारत पाटणकर

महात्मा फुले टीका आणि टीकाकार. लेखक : नीलकंठ बोराडे

महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक : धनंजय कीर. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आणि मंडळ

महात्मा फुले दुर्मिळ वाङ्‌मय आणि समकालीन चरित्रे. लेखक : मा. गो. माळी

महात्मा फुले यांची कविता-एक विचार मंथन (शशिशेखर शिंदे)

महात्मा फुले यांचा शोध व बोध. लेखक : रा.ना. चव्हाण

महात्मा फुले यांच्या अप्रकाशित आठवणी (संपादित) प्रकाशक : श्री गजानन बुक डेपो

महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग. लेखक : विद्याकर वासुदेव भिडे

महात्मा जोतीराव फुले - वारसा आणि वसा. लेखक : भास्कर लक्ष्मण भोळे

महात्मा फुले सामाजिक क्रांतीचे अग्रदूत. लेखक : दत्ता जी. कुलकर्णी

महात्मा फुलेंची जीवनक्रांती. लेखिका : लीला घोडके

युगपुरुष महात्मा जोतीराव फुले. लेखक : बा.ग. पवार

सत्यशोधक (मराठी नाटक) लेखक : गो.पु. देशपांडे दिग्दर्शक अतुल पेठे.

महात्मा फुले (मराठी चित्रपट) निर्माते-दिग्दर्शक आचार्य अत्रे.

मी जोतीबा फुले बोलतोय (एकपात्री नाटक) : लेखक-सादरकर्ते कुमार आहेर. कुमार आहेरांना या कार्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्‍कार’ दिला आहे.

महात्मा जोतीबा फुले (लोकनाट्य) लेखक : शंकरराव मोरे





फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम

अ.क्र. दिनांक / महिना इ.स. घटना

१. एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म कटगुण, सातारा जिल्हा

२. इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.

३. इ.स. १८४० नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.

४. इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.

५. इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.

६. इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.

७ इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .

८. इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.

९ इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.

१० इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्‍या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.

११ इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.

१२ नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.

१३ इ.स. १८४७ थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा अभ्यास.

१४ इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.

१५ इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.

१६ सप्टेंबर ७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.

१७ इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.

१८ मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

१९ नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.

२० इ.स.१८५३ दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स स्थापन केली.

२१ इ.स.१८५४ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.

२२ इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात केली.

२३ इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्‍न झाला.

२४ इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

२५ इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.

२६ इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.

२७ इ.स.१८६५ विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

२८ इ.स.१८६४ गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.

२९ इ.स.१८६८ दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

३० २४ सप्टेंबर इ.स.१८७३ सत्यशोधक समाजची स्थापना केली.

३१ इ.स.१८७५ शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).

३२ इ.स. १८७५ स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.

३३ इ.स. १८७६ ते १८८२ पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.

३४ इ.स. १८८० दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.

३५ इ.स.१८८० नारायण मेघाजी लोखंडे यांना मिलहॅण्ड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.

३६ इ.स.१८८२ विल्यम हंटर शिक्षण आयोगा समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.

३७ इ.स.१८८७ सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.

३८ इ.स.१८८८ ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.

३९ ११ मे इ.स.१८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून महात्मा ही पदवी प्रदान केली.

४० नोव्हेंबर २८ इ.स.१८९० पुणे येथे निधन.

समारोप



विद्याध्यायनासाठी ज्यांचा सतत असे प्रयास,



त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.



परि स्त्री शिक्षण हा एकची असे ध्यास, हा एकची असे ध्यास,



या उक्तीप्रमाणे महात्मा जोतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्‍नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जाते. कारण ते सामान्यांतील असले तरी विचाराने व कर्तृत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. शिक्षण व समता या दोन शब्दांतच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी रात्रंदिवस झटणारे ते सेवक होते.




सम्बन्धित प्रश्न



Comments Ankita dhumal on 04-01-2024

Mahatma phule yani lihleli pustake

Punam chindha ingale on 12-12-2023

Dr Babasaheb Ambedkar yanche Karya

Vaibhavi dipak THOMBARE on 14-06-2023

सावित्रीबाईंचा जन्म कोठे झाला


Manasi on 19-08-2022

Mahatma phule yanche karya nibhand

Priya mourya on 31-05-2021

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची कार्य

Narayan on 08-04-2021

महात्मा फुले यांच्यावर कोणत्या लेखकाचा विशेष प्रभाव जाणवतो?

Purva bhangrath on 13-02-2021

सावित्रीबाई यांचे शिक्षण कोठे झाले


Kiran Gavhane on 06-02-2021

महात्मा फुले यांच्या उपाय योजना कोणत्या आहेत याचे उत्तर पाहिजे



Vaibhavi Rajendra nanaware on 31-01-2020

सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य माहिती

Vaibhavi dipak THOMBARE on 03-09-2020

ए माहिती हमे अच्छे लगे



नीचे दिए गए विषय पर सवाल जवाब के लिए टॉपिक के लिंक पर क्लिक करें Culture Current affairs International Relations Security and Defence Social Issues English Antonyms English Language English Related Words English Vocabulary Ethics and Values Geography Geography - india Geography -physical Geography-world River Gk GK in Hindi (Samanya Gyan) Hindi language History History - ancient History - medieval History - modern History-world Age Aptitude- Ratio Aptitude-hindi Aptitude-Number System Aptitude-speed and distance Aptitude-Time and works Area Art and Culture Average Decimal Geometry Interest L.C.M.and H.C.F Mixture Number systems Partnership Percentage Pipe and Tanki Profit and loss Ratio Series Simplification Time and distance Train Trigonometry Volume Work and time Biology Chemistry Science Science and Technology Chattishgarh Delhi Gujarat Haryana Jharkhand Jharkhand GK Madhya Pradesh Maharashtra Rajasthan States Uttar Pradesh Uttarakhand Bihar Computer Knowledge Economy Indian culture Physics Polity

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।






Register to Comment